Friday, November 4, 2011

नटरंग

मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का??
मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले?

अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला. म्हंटल काही हरकत नाही, काय होईल फार फार तर १०० रु. वाया जातील...अगदी नवी कल्पना, मस्त अभिनय ..मला खूप आवडला "वळू". मग हळू हळू बरीच नवीन नावं ऐकू यायला लागली रात्र आरंभ, गाभ्रीचा पाऊस, हल्लीच देऊळ त्यातच एक नाव होते नटरंग. विषय वाचला "तमाशा", आधी वटला काय असणार नवीन ? फार फार तर गाणी आणि सजावट. पण विषय बराच वेगळा आहे. कथा, अभिनय अन गाणी सगळेच अप्रतिम. एकाच उणीव ती म्हणजे गावठी हेल काढून बोलणे, गावठी स्क्रिप्ट लिहिणे तितकेसे जमत नाही.

सुरुवात होते एका पुरस्कार समारंभाने ज्यात गुणा आपले मुख्य पात्र याला जीवनगौरव पुरस्कार मिळतो. हा एक बायका -पोरं अन म्हातारा बाप असलेला सामान्य शेतमजूर ज्याला तमाशाची आवड / नाद असतो. त्याच्या शेतमालकाने नवीन साधनं आणल्याने त्याची मजुरी सुटते. हा गुणा वाग लिहिण्यात हुशार असतो अन त्याला त्याची खूप आवडही असते. त्याच्यासारख्याच मजुरांना घेऊन तो तमाशाचा फड उभा करू लागतो...त्याचा म्हातारा बाप त्याच्या विरोधात असतो..सासरासुद्धा येतो कि " हवं तर मी तुम्हाला नवीन धंदा उघडून देतो पण तमाशा नको"...गुणा त्याच्या निश्चयावर ठाम असतो. धडपड करून एक एक करत सगळे जमत आलेले असते पण तमाशा म्हंटल्यावर बाई हवीच...तीसुद्धा चांगली नाचणारी, दिसणारी अन गाणारीसुद्धा...ते कसं जमायचं? जमवतात कसंतरी...
बरीच धावपळ केल्यावर अन मार खाल्ल्यावर एक तमासगीर मुलगी अन तिची आई तयार होतात पण एका अटीवर "तमाशात नाच्या हवा त्याशिवाय नाचणार नाही". आली का पंचाईत!! इथे सगळे "मर्द" तर नाच्या कोण होणार? सगळं फिसकटतय का काय अशी परिस्थिती येते...शेवटी आपला गुणा तयार होतो.

मुख्य नाचणारी त्याला स्त्रीचे हावभाव, चालणे, बोलणे, मुराकणे शिकवते अन एका नव्या आयुष्याला सुरुवात होते. दोन फड लावल्यानंतर लगेच त्यांना सुपाऱ्या मिळायला लागतात...लोकांना फड खूप आवडलेला असतो. इकडे गावातील लोक त्याच्या बायकोला नक्को जीव करून सोडतात...बायका टोमणे मारतात, पुरुष तिचा गैरफायदा घ्यायला बघतात अन लोक त्याच्या मुलाला त्रास देऊ लागतात..काहीबाही बोलू लागतात. खुद्द त्यालासुद्धा त्याच्याच तमाशात नवीन आलेल्या ढोलकीवाल्याकडून अंगचटीला जाणे अन शारीरिक सुखाची मागणी याला सामोरे जावे लागते.

दौर्यावर असताना दोन राजकीय गटांमधील सुंदोपसुन्दीत त्याच्या थेटरला आग लावली जाते अन त्याच्यावर बलात्कार होतो. सगळं उन्मळून पडल्यावर तो घराकडे जातो तर घर बंद असते...बायको मुलांसाठी सासरी जातो तर त्याची छी थू करून हाकलला जातो...अगदी त्याच्या मुलाकडूनसुद्धा. आता त्यांना तरी कसा दोष देणार? परत आल्यावर कोणताही साथीदार नवीन सुरुवात करायला तयार होत नाही, एक सोडून ..त्याची नर्तकी. ती त्याची साथ देते अन शेवटी जीवनगौरवपुरस्कारापाशी येऊन सिनेमा थांबतो.